ऋतू येत होते, ऋतू जात होते
ऋतू येत होते, ऋतू जात होते
कधी खिन्न होते, कधी गात होते!
किनारे सुखाचे कुणाला मिळाले?
कितीसे खलाशी समुद्रात होते...
उगा शोधले तू नभी चंद्र तारे
तुझे चांदणे तर तुझ्या आत होते!
मनी काय होते ऋतूंच्या कळेना
शिशिर जीवघेणे वसंतात होते...
सदा आर्जवांची रिकामीच पोटे
सदा याचनांचे रिते हात होते
अता बोलतो मी मनाशीच माझ्या
तुझे दूर जाणे अकस्मात होते...
तशी मोहरायास बंदीच होती
इथे चांदणेही तुरुंगात होते...
अशा मुग्ध चाली तुझ्या लोचनांच्या
किती टाळला शह, तरी मात होते!
भुजंगप्रयाता तुझे तंत्र साध्या
लगागा लगागा लगागात होते!
- वैभव जोशी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा